मी पाचवी मध्ये होतो, शाळेचा पहिला दिवस होता तो, मला आजही आठवत आहे. खूप खुश होतो कारण नवीन वर्ग, नवीन मित्र, नवीन अभ्यासक्रम. अगदी सर्वच काही नवीन. आमच्या शाळेत वर्गात जास्त मस्ती व्हायला नको म्हणून, एका बाकावर एक मुलगा आणि मुलगी बसवत असतं. आणि तिथेच माझी ओळख निशा सोबत झाली. ती आणि मी एकाच बाकावर बसत होतो. पण अतिशय लाजरी, जास्त कोणाशी न बोलणारी, अभ्यासू, आणि खूप हुशार. मी जेव्हा तिला पहिल्यांदा पहिले तेव्हा मला तिच्या हातातल्या बांगड्या एवढ्या आवडल्या होत्या की, ती जेव्हा पण शाळेत यायची तेव्हा मी तिच्या बंगड्याकडेच बघत असायचो. कारण तेव्हा आपले वय पण बालिश असते. त्यामुळे कुठेही समाधान मिळतो आपल्याला.
असो पण शाळा सुरू झाल्यापासून पुढचे तीन महिने तरी निशा माझ्याशी बोलली नव्हती. वर्गातले दुसरी मुले तर खूप लांबची गोष्ट आहे पण ती मुलीसोबत पण जास्त बोलत नव्हती. पण पुढे हळू हळू आमच्यात घट्ट मैत्री होत गेली. तिने गृहपाठ केला की तिची पहिली वही मला मिळत असे. तिने आणलेला टिफीन मी खात असतं आणि मी आणलेला टिफीन ती खात असतं. आमच्या अशाच मैत्रीमध्ये तीन वर्ष कधी निघून गेली पत्ताच लागला नाही. पण आता तिला माझी आणि मला तिची खूप सवय लागली होती. कोणी दुसरी मुलगी माझ्याशी बोलली तर तिला ते अजिबात आवडत नव्हते. फक्त मी आणि ती दोघेच खूप बोलत असत. सर्व मुलांना असाच संशय होता की आमच्या मध्ये प्रेमाचे नाते आहे. माझ्या मनात तेव्हा तस काही होत मला माहित नाही पण मला तिची सोबत खूप आवडायची. ती थोडीपन माझ्या नजरेसमोर नसली तर मला करमत नसे.
एक दिवस निशाला तिच्या मैत्रिणीने विचारले “काय ग..! तुझा आणि महेंद्रचे काय चालू आहे का? तुमच्यात प्रेमाचे नाते आहे का? असे मला नाही आपल्या शाळेतल्या प्रत्येकाला वाटत आहे” हे त्या मुलीचे बोलणे ऐकून तिला खूप रडायला लागली. ती धावत धावत माझ्याकडे आली. मला तिने विचारले की “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” मला काहीच सुचले नाही तेव्हा की मी काय बोलू. असे अचानक ही का विचारत आहे. मला पण ती खूप आवडतं होती, कदाचित तीलापण मी आवडत होतो. पण तिच्या या प्रश्नाला मी नकळत नाही असे उत्तर दिले. मग ती बोलली की, आपले असे काही नाही मग सर्व मुलांना असे का वाटत आहे की आपले काहीतरी आहे म्हणून. मग मी तिला समजावले हे बघ निशू, बोलणारे बोलत राहतात आपण लक्ष नाही द्यायचे. तुला माहित आहे ना आपले घट्ट मैत्रीचे नाते आहे , मग तू नको लक्ष देऊ. माझ्या या बोलण्याने तिला खूप धीर आला.
दहावीचे वर्ष खूप अभ्यासाचे असते असे सर्व पालक म्हणतात. म्हणून मुलांनो अभ्यास करा अभ्यास करा असे चालूच असते. आम्ही एकाच गावात राहत असल्यामुळे मी रोज निशाच्या घरी अभ्यासला जायचो. दिवसातील खूप वेळ आम्ही सोबत असायचो. एवढी सवय झाली होती आम्हाला एकमेकांची की आम्हाला एकमेकांना पाहिल्या शिवाय करमत नसत. नकळतपणे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. तिलाही हे माहीत होत आणि मलाही माहीत होत. पण पहिले पाऊल घेऊन विचारणार कोण?? हा प्रश्न होताच. पूर्ण दहावीचे वर्ष गेले, परीक्षेचा शेवटचा पेपर होता. तिने परीक्षा केंद्रात जाताना मला एवढेच बोलली की “पेपरचा टाईम संपला की बाहेर थांब मला तुझ्यासोबत काम आहे”. तिचे हे बोलणे ऐकून मला नवळ वाटण्यासारखे काहीच नव्हते. कारण खूप वेळा तिची कामे असल्यावर ती अशी म्हणत असे. पण तिच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळेपणा मला दिसला. मी जाणून गेलो की आज ही मला प्रपोज करणार.
मी खूप खूष होतो, या आनंदात माझा शेवटचा पेपर सुद्धा छान गेला. ठरल्याप्रमाणे मी परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबलो. तिने तिच्या मैत्रिणीला पुढे जायला सांगितली आणि ती माझ्याजवळ आली. मला म्हणाली की “तू मंद आहेस का रे?” एका क्षणांत मला काहीच सुचले नाही. अरे ही अशी का बोलत आहे. मी काहीही केलं नाही. मी तिला विचारले “का ग काय झाले?”
आपल्या मैत्रीला किती वर्ष झाली?
मी म्हणालो पाच वर्ष.
मग या पाच वर्षात तू मला कुठे ओळखण्यात कमी पडलास का. मी का शांत आहे? माझ्या गप्प बसण्यामागचे कारण? माझ्या आनंदाचे कारण? या सर्व तर गोष्टी तुला कळतात मग हे तुला का नाही कळले. मी तिला परत येड्यासारखा प्रश्न विचारला “काय कळले नाही मला”.
हे ऐकुन मात्र ती भडकली. तुला एवढे हिंट देऊन सुद्धा तुला कळत नाही का रे. “आय लव यू स्टुपिड”.
बस हेच तर ऐकायचे होते मला. साक्षात तिने मला स्वतः प्रपोज केलं आणि मी मात्र मंद सारखा तिच्याकडे बघत होतो. ये निशु मला पण तू खूप आवडतेस. अगदी तुला जेव्हा पहिल्या दिवशी पाहिले ना, तेव्हापासून. मग ती मला रागात म्हणाली, अरे मग हे सांगणार कधी माझं लग्न झाल्यावर का?? असे म्हणत हळूच ती माझ्या मिठीत शिरली. आजूबाजूला खूप लोक होते पण कोणाचा विचार न करता तिने हे धाडस केलं. आणि मी मात्र फक्त ते पाहतच राहिलो.
आमचे नाते आणखी बहरत होते. अजिबात करमत नव्हते आम्हाला एकमेकांशिवाय. पुढच्या लाईफ बद्दल खूप अशा गोष्टी आम्ही ठरवून ठेवल्या होत्या. आपले घर कसे असेल? घरात कोणत्या कलर चे पडदे असतील. हे सर्व तिने आधीच ठरवून ठेवले होते. एवढेच काय तर मुलांची नावे सुद्धा आम्ही ठरवून ठेवली होती. आमचे नाते खूप चांगल्या रीतीने चालू होते. पण पुढे जेव्हा आमची बारावी झाली तेव्हा मात्र तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुर वात केली. निशा खूप अस्वस्थ होती. कारण माझ्याशिवाय जगणे तिला मान्यच नव्हते. आणि आणखी खूप मोठा प्रश्न होता तो म्हणजे आमची जात. कोणती जात वैगेरे मी सांगत नाही. पण प्रेम करताना कोणी कधी जात पात पाहत नाही. आमचेची तसेच झाले. आणि खरे तर माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण मी आधीच सांगून ठेवले होते घरात.
निशाच्या घरच्यांना मात्र आमच्या प्रेम मान्य नव्हते. तिच्या वडिलांनी तर तिला आधीच सांगून ठेवले होते की जर चुकूनही महेंद्र सोबत लग्न केलेस तर आम्ही दोघेपण आत्महत्या करू. त्यांच्या भितीने तिने पण येईल त्या मुलाला हो म्हणायचे ठरवले. अशातच खूप दिवस गेले. आम्ही बेचैन होतो कारण खूप दिवस आमची भेट झाली नव्हती. आणि कदाचित पुढे होणार सुद्धा नव्हती असे वाटत होते. माझे तिच्यावर प्रेम मनापासून होते. एक वेळ मनात आले होते की पळून जाऊन लग्न करावे पण तिच्या आईवडिलांनी चुकून सुद्धा काही केले असते तर ती आणि मी कधीच आयुष्यात सुखी राहिलो नसतो.
अखेर एक दिवस तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगा पसंत केला. लग्नाची तारीख सुद्धा काढली. मी मात्र तिच्या आठवणीत रडल्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो. निशाची पण तीच अवस्था असेल हे मला चांगलेच माहीत होते. तिचे घरचे मात्र खूप खुश होते कारण निशाला मिळालेला मुलगा बिल्डर होता. त्यांची परस्थिती खूप गडगंज होती. त्यामुळे घाईघाईत त्यांनी लग्नाची तयारीला सुर वात केली होती. मला मात्र तिच्या शिवाय करमत नव्हते. सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता. पण यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. तिची माझी अधुरी कहाणी इथेच संपली होती.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)