जी व्यक्ती शेती करून वर आलेकी असतो ना त्याला त्याची मुळं चांगली ठाऊक असतात. आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलोय ह्याची जाणीव त्याला असते. मग असा व्यक्ती कोणत्याही संकटाना हसत हसत सामोरे जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. ह्या व्यक्तीच नाव आहे रवींद्र फतरू वंजारी (Ravi Vanjari). ते सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची बॉडी पाहून भले भले गुन्हेगार त्यांच्या समोर हात टेकतात.

रवींद्र ह्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्यांनी गरिबी काय असते हे खूप जवळून पाहिले होते. कमी गोष्टी असून सुद्धा आनंद कसा शोधायचा हे ते लहानपणीच शिकले होते. पण म्हणतात ना अंगात जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांना लहानपणापासूनच पोलिस दलात भरती व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही चालू ठेवले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ते २००६ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले.
ज्या प्रमाणे आपल्या क्रांतिकारी, नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशभक्ती दाखवली आहे त्याच प्रमाणे आपणही काहीतरी ह्या देशासाठी करू शकतो, देशसेवा करू शकतो ह्याच उद्देशाने ते भरती झाले होते. त्यांना आधीपासूनच बॉडी बिल्डिंगची आवड तर होतीच पण रुजू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ही आवड जोपासली आणि अनेक ठिकाणी स्पर्धेत उतरून भारताचे नाव उंचावले आहे. अनेक प्रसार माध्यमांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कार्याचे लेख प्रकाशित केले आहेत.
सध्या रवींद्र वंजारी पोलीस नाईक ह्या पदावर जळगाव इथे कार्यरत आहेत. इंटरनॅशनल, नॅशनल स्पर्धेत त्यांनी कधी भारतासाठी तर कधी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांचे असे म्हणणे सुद्धा आहे की पोलीस म्हटले की लोक पोलिसांना घाबरून असतात पण मी जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा त्यांचा मित्र आहे असेच बोलतो. जेणेकरून ते माझ्याशी बोलताना स्पष्ट बोलतात. पहिल्यापासून ते आतापर्यंत रवींद्र ह्यांना सुहास खामकर ह्यांची साथ लाभली आहे. तेच त्यांचे गुरू आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून सुहास खामकर ह्यांनी नेहमीच रवींद्र ह्यांना योग्य दिशा दाखवली आहे.

त्यांनी बॉडी बिल्डिंग मध्ये जिंकलेल्या स्पर्धेची लिस्ट खूप मोठी आहे.
जळगाव जिल्हा श्री (२०१६,२०१७,२०१८ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स), उत्तर महाराष्ट्र श्री (२०१६,२०१७,२०१८ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा (सुवर्णपदक २०१८), महाराष्ट्र श्री (रौप्य पदक २०१७), महाराष्ट्र श्री (पाचवे स्थान २०१८), मिस्टर इंडिया (पाचवे स्थान २०१८), मुंबई महापौर श्री (रौप्य पदक २०१८), मयुर कप (पाचवे स्थान २०१७), स्वामी समर्थ श्री (रौप्य पदक २०१८), हनुमान श्री कोल्हापूर (सातवे स्थान २०१८), मिस्टर आशिया (सहावे स्थान २०१८), महाराष्ट्र पोलीस (सुवर्णपदक २०१७,२०१८), ऑल इंडिया पोलिस स्पर्धा (कांस्य पदक २०१८), पुणे महापौर श्री (रौप्य पदक २०१८), सारंग श्री (सुवर्णपदक २०१८), सारसार क्लासिक (सुवर्णपदक २०१८), आमदार श्री भाडगाव (सुवर्णपदक २०१८), सेंट्रल रेल्वे श्री (सुवर्णपदक २०१८), पुणे श्री (रौप्य पदक २०१९), भारताकडून वर्ल्ड चॅम्पियन शिप चायना मध्ये झालेल्या स्पर्धेत निवड (२०१९), २०१८ २०१९ मध्ये महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग टीम चा कर्णधाररवींद्र ह्यांना त्यांची कामगिरी पाहता अनेक पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहेत. दिव्य सूर्य पुरस्कार (२०१३), आदर्श पोलीस पुरस्कार (२०१६), जिल्हा क्रीडा पुरस्कार (२०१७), शंभू राजे पुरस्कार (राज्यपातळीवर २०१८), खानदेश रत्न पुरस्कार (२०१९), उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न (२०१९), बेस्ट फिटनेस ऑफ महाराष्ट्र पोलीस (२०२०).
निवृत्तीनंतर सुद्धा त्यांना देशसेवा करायची आहे. गरीब अनाथ मुलांचे पालकतत्व स्वीकारून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. खेड्यातील तरुणांना पोलीस किंवा सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित करायचे आहे. त्यांचे हे विचार खरंच आजच्या पिढीसाठी उत्तरं मार्गदर्शन आहे. त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा आणि त्रिवार अभिवादन.