मस्त संध्याकाळची वेळ होती. एका बागेत बसून मस्त येणाऱ्या थंड थंड वाऱ्याच्या आनंद घेत होतो, आकाशात पक्षी आपापल्या घराकडे निघाली होती असं वाटतं होत की ही संध्याकाळ कधी संपूच नये. इतक्यात माझा गावातील एक मित्र आला म्हणाला संकेत जरा घरी येतोस का काम होते रे तुझ्याकडे थोडे. मी म्हणालो नाही रे खूप कंटाळा आला आहे नंतर येतो असे त्याला इग्नोर करून पुन्हा त्या निसर्गाचा आनंद घेत राहिलो.
पण इतक्यात पुन्हा माझ्या मित्राचा फोन आला म्हणाला अरे तू येतोस ना की मी एकटाच जाऊ, अरे हा पिक्चर बघायला जायचं आहे ना आलोच थांब मी तुझ्या घरी असे बोलून मी मस्त तयार होऊन प्रदीपच्या घरी गेलो. जाऊन बाहेर हॉल मध्ये खुर्चीत बसलो. समीरच्या टेबलावर असलेला न्युज पेपर हातात घेतला आणि वाचत बसलो, मधेच प्रदीपला दोन ते तीन वेळा आवाज देऊन ही झालो.
आलो दोन मिनिटात असे बोलून जवळ जवळ १० मिनिटे झाली. इतक्यात समोर हातात चहाचा कप आला मी आश्चर्याने पाहिले कोणी दिला कारण काकू तर कालच बाहेर आपल्या मुलीकडे गेल्या आहेत. एका मुलीने चहा आणून दिला होता. ती सुंदर नसली तरी माझ्या मनावर तिने घर केले होते, नक्षीकाम केलेला रेखीव चेहरा, मोठे आणि सुंदर डोळे, टोकदार नाक, आणि तिच्या ओठांवर असणारा तीळ तिचे सौदर्य अधिक खुलवत होते. इतक्यात प्रदीप आला म्हणाला संकेत चल त्याने दोन ते तीन वेळा आवाज दिला तेव्हा माझी तंद्री उडाली
आज पिक्चर बघताना ही माझं लक्ष त्याच्याकडे नव्हतं खरंच का मला ती आवडायला लागली होती पण कसं शक्य आहे? एका भेटीत इतकं कोणी आवडायला लागतं का? कदाचित हो मला आता ती आवडू लागली होती अगदी मनापासून. पण तिचं काय? तिला आवडेल का मी? तसा मी दिसायला छानच आहे त्यामुळे तिला आवडायला तर हवाच.
अचानक माझ्या डोक्यावर कुणीतरी टपली मारली अरे, संकेत लक्ष कुठे आहे तुझे किती हाका मारल्या तुला. अरे काही नाही सहजच असाच थोडा विचार करत होतो. म्हणता म्हणता बोलून गेलो त्याला, चल तुझ्या घरी जरा जाऊन येऊ त्याने विचारले कशाला, काही नाही रे सहजच बसून गप्पा मारू. असे म्हणत मी त्याच्याशी गप्पा मारायच्या निमित्ताने तिला पाहायला निघालो. आता हे नेहमीच करू लागलो. काही ना काही कारण देत मी त्याचे घर गाठाय चो. दिवसेंदिवस मी अजुनच तिच्या प्रेमात पडत चाललो होतो.
शेवटी न राहून एक दिवस मी प्रदीप जवळ माझे मन मोकळे केले. तो म्हणाला तुला माहित आहे का ती कोण आहे कदाचित तिच्याबद्दल ऐकुन तू तिच्याशी लग्न करायला नकार देशील, ती एक विधवा आहे. माझ्या मावशीची मुलगी आहे. जवळ जवळ महिनाच झाला असेल लग्न होऊन आणि तिचा नवरा मिलेक्ट्री मध्ये होता. विरोधी हल्ल्यात नवरा गेला ही इतकी सुंदर आणि तरणी ताठी मुलगी विधवा झाली. तिथे राहून तिला अधिक विचार आले असते म्हणून मावशी म्हणाली काही दिवस घेऊन जा.
प्रदीपचे बोलणे ऐकून मी खुर्चीवरून उठलो आणि सरळ आमचे घर गाठले. समोर खुर्चीत आई बसली होती. आईला मी सर्व हकीकत सांगितली पहिल्यांदा तर ती नाहीच बोलली पण मी तिला समजावले म्हणालो “आई त्या ठिकाणी आपली ताई असती तर ग..?” इतकं ऐकल्यावर आई ही गप्प बसली. थोड्या वेळाने आईने स्वतः येऊन लग्नाला होकार दिला म्हणाली जा मागणी घालून ये लवकर.
अशा पद्धतीने पुढच्याच महिन्यातचे लग्न झाले. आता आम्हाला दोन मुल आहेत खूप सुखी संसार आहे आमचा. म्हणतात ना संसार हा विश्वासावर अवलंबून असतो तो असावा थोडी कुजबुज थोडी मस्ती आणि थोडी भांडणे ही असावी पण लोणच्या सारखी फक्त चवीला. आणि आयुष्यात काही निर्णय असे घ्यावे लागतात जे कधी कधी इतरांना पटणार नाहीत पण तुम्हाला पटतील आणि तेव्हा सर्वस्वी निर्णय तुमचा असला पाहिजे.
समाप्त
ह्या कथा पण वाचा
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)